हरिश्चंद्रगड – माहिती
हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील एक प्रमुख गड आहे (एखाद्या किल्ल्याप्रमाणे याला तटबंदी आणि बुरूज नसल्याने त्याचा समावेश गडांमध्ये करावा लागेल).
महाराष्ट्रातील तीन प्रमुख जिल्ह्य़ांच्या (ठाणे , पुणे आणि अहमदनगर) सीमा जिथे लागतात तिथे या गडाचे स्थान आहे.
कसे जावे ?
या अजस्र गडावर येण्याचे तीन प्रचलित मार्ग आहेत.
पहिला सोपा मार्ग अहमदनगर जिल्ह्यातील पाचनई गावातून मंगळगंगा नदीच्या प्रवाहाला समांतर येतो. या मार्गावरून गडावर येण्यासाठी २.३० -३.०० तास लागतात.या मार्गावरून येताना आपण गड उत्तरेकडून दक्षिणेकडे चढतो.
दुसरा मार्ग दक्षिण पूर्वेकडून पुणे जिल्ह्यातील खिरेश्वर गावातून टोलार खिंडीतून येतो.या मार्गावरून गडावर येण्यासाठी ४.०० -४.३० तास लागतात.या मार्गावरून येताना आपण गड टोलार खिंडीपर्यंत दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि पुढे डावीकडे वळल्यावर पूर्वेकडून
पश्चिमेकडे चढतो.हा मार्ग पहिल्या मार्गाच्या तुलनेत अवघड आहे.
तिसरा मार्ग ठाणे जिल्ह्यातील बेलपाडा मार्गे आहे.हा मार्ग म्हणजे सरधोपट पायवाट नसून अजस्र खडकांमधून वर्षानुवर्ष कोसळणाऱ्या धबधब्यामुळे नैसर्गिकरित्या तयार झाला आहे.हा मार्ग हरिश्चंद्रगडाचा मध्यबिंदू समजला जाणाऱ्या हरिश्चंद्रेश्वर मंदिराकडे न येता हरिश्चंद्रगडावरील प्रमुख आकर्षण असलेल्या कोकणकड्यावर येतो.असंख्य अजस्र खडक सर करण्यासाठी या वाटेने येताना प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे.
काय पहावे ?
हरिश्चंद्रेश्वर मंदिर –
शिलाहार राजा झंज याच्या काळात (८ वे शतक) बारा नद्यांच्या जवळ शिवमंदिरांची स्थापना करण्यात आली होती, त्यापैकी मंगळगंगा नदीच्या उगमस्थानी असलेले शिवमंदिर हेमाडपंती शैलीचे असून एका भल्यामोठ्या कातळामधून कोरून काढले आहे.हे मंदिर हरिश्चंद्रगडाचा मध्यबिंदू आहे.
प्रथमदर्शनी या मंदिराचा सोनेरी कळस दृष्टीस पडतो आणि आपण जसजसे मंदिराच्या जवळ जातो आपल्याला मंदिर उलगडत जाते.मंदिराच्या सभोवती दगडी भिंत आहे जी मंदिराचा आवार स्पष्ट करते.मंदिराचे प्रवेशद्वार एका वेळेस एकच व्यक्ती आत जाऊ शकेल इतके छोटे असले तरी प्रवेशद्वाराजवळील दगडातील कोरीव कामामुळे शोभून दिसते.
प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर मुख्य मंदिर आहे ज्यात शिवपिंड, नागाची प्रतिकृती , घंटा आणि त्रिशूळ आहे. शिवपिंडीवर दुग्धाभिषेकासाठी कमंडलू आहे. शिवपिंडीसमोर दगडात कोरून काढलेला नंदी आहे. मुख्य मंदिराच्या डावीकडे शेंदूर लावलेली सुबक गणेश मुर्ती आहे.
मुख्य मंदिराच्या मागे एक प्रशस्त गुहा आहे.या गुहेत एक पालखी पहावयास मिळते.हरिश्चंद्रगडावर येणारे पर्यटक या गुहेत वास्तव्य करू शकतात.या गुहेच्या खाली एक तळघर आहे.या तळघरात चांगदेव ऋषींनी १४०० वर्षे तप केले होते असे स्थानिक गावकरी सांगतात.गुहेच्या खाली पाण्याच्या अनेक टाक्या आहेत.त्यातील गुहेच्या डाव्या बाजूस असलेल्या टाक्यातील पाणी पिण्ययोग्य आहे.
मुख्य मंदिराच्या आवारात अनेक छोटी मंदिरे आहेत. अनेक प्राचीन दगडी वास्तू आहेत.त्यांची पडझड झाली असल्याने त्या वास्तूंची ओळख पटत नाही.परंतु या मंदिर परिसरातून प्राचीन वैभवाची प्रचीती येते.
हरिश्चंद्रेश्वर मंदिर हे प्राचीन स्थापत्यशैलीचे उत्तम उदाहरण आहे.एका अजस्र कातळामधून कोरीव काम करून अशा प्रकारची मंदिरे उभारण्याची परंपरागत कला त्या काळात प्रचलित होती.
कोकणकडा –
हरिश्चंद्रगडावरचे मुख्य आकर्षण काय, असा प्रश्न विचारल्यावर त्याचे बहुमताने जे उत्तर मिळते ते म्हणजे कोकणकडा.एखाद्या चित्रकाराने आपल्या कल्पनेतून डोंगरावरून दिसणारे दृश्य या नावाने एक निसर्गचित्र काढले तर ते जसे दिसेल तसे प्रत्यक्षात कोकणकड्यावरून दृश्य दिसते.
कोकणकडा हा एक अंतर्वक्राकार आकाराचा ३५०० फूट खोल दरी असलेला , एखाद्या अर्धवट तुटलेल्या बशीच्या आकाराचा कडा , हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या पश्चिमेला आहे.या कड्याच्या मध्यावर उभे राहिले असता उजवीकडे नळीची वाट, डावीकडे रोहिदास शिखर आणि समोर दरीत कोकणाचा (ठाणे जिल्ह्यातील) प्रदेश दिसतो.
कोकणकड्याच्या उंचीमुळे आणि पावसाळ्यात पसरणार्या दाट धुक्यामुळे इथून दरीत पडण्याची शक्यता आहे.यावर उपाय म्हणून आता सुरक्षेच्या दृष्टीने इथे रेलींग बसवलेले आहे.कोकणकड्याचे एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंतचे अंतर साधारण एक कि.मी आहे.संपूर्ण कोकणकडा फिरण्यास अर्धा तास लागतो.
कोकणकडा वेगवेगळ्या ऋतुंमध्ये वेगवेगळे चित्र दाखवतो. उन्हाळ्यात सर्वत्र काहिली होत असताना कोकणकड्यावरील गार वारा सुखावह अनुभव देतो. हिवाळ्यात आल्हाददायक थंड हवा इथे अनुभवता येते.पावसाळ्यात ढग खाली येतात आणि दाट धुक्याची दुलई पांघरलेला कोकणकडा एक वेगळाच पावसाळी अनुभव देतो.
पावसाळ्यात कोकणकड्याच्या दरीत पावसाचे ढग अडकतात (अंतर्वक्र आकारामुळे) आणि त्याच वेळेस जर दुसर्या बाजूला (विरूद्ध दिशेला) सूर्यप्रकाश असेल तर तिथे माणसाची सावली मागील ढगांवर पडते आणि एका विशिष्ट वेळेस त्या सावलीभोवती पुर्ण इंद्रधनुष्य दिसते, यालाच इंद्रवज्र असे म्हणतात. इंद्रवज्र फारच क्वचित अनुभवता येते.
सप्ततीर्थ आणि पुष्कर्णी
हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूला सलग १४ छोट्या कोनाड्यांचा एक समुह बघावयास मिळतो.या कोनाड्यांमध्ये भगवान विष्णुदेवांच्या मूर्ती होत्या.पण साधारण १० -१२ वर्षापूर्वी येथे येणाऱ्या पर्यटकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे अशा पवित्र जागी झालेल्या अस्वच्छतेमुळे त्या मूर्ती मुख्य मंदिरात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.या समुहासमोर एक कुंड आहे.१० -१२ वर्षापूर्वी तेथील पाणी पिण्ययोग्य होते असे म्हणतात.आता ते खराब झाले आहे.हरिश्चंद्रगडावर येणारे काही सुजाण पर्यटक या वास्तूचे वैभव पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना यात काही प्रमाणात यशही आले आहे.
केदारेश्वर गुहा
केदारेश्वर गुहा ही हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या उजवीकडे खाली आहे.हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या आवारात असलेल्या गुहेच्या खाली असलेले पाण्याचे टाके या गुहेशी जोडलेले आहे.या गुहेत एक मोठे शिवलिंग आहे.या शिवलिंगाभोवती असणारे पाणी अतिशय थंड आहे. या गुहेच्या बाजूला एक खोली आहे.या गुहेच्या भिंतीवर काही प्राचीन चित्रे कोरली आहेत.या शिवलिंगाभोवती असलेल्या सभामंडपात चार खांब होते. आज संपूर्ण सभामंडप आश्चर्यकारक रित्या केवळ एका खांबावर तोलले आहे.एका प्रथेनुसार हे शिवलिंग स्वयंभू असून त्या सभामंडपातील चार खांब हे चार युगांना दर्शवतात.यातील एक शिल्लक असलेला खांब कलियुगाला दर्शवतो आणि ज्या हा खांब ज्या क्षणी कोसळेल त्या क्षणी कलियुगाचा अंत होऊन जगाचा विनाश होईल.
तारामती शिखर
तारामती शिखर हे हरिश्चंद्रगडावरचा सर्वात उंच स्थान आहे.येथे जाणारी पायवाट हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या जवळून जाते.इथे येण्यास हरिश्चंद्रेश्वर मंदिरापासून साधारण अर्धा तास लागतो.इथे येण्यासाठी खडी चढण पार करावी लागते.तारामती शिखराजवळ एक गणेश मूर्ती आहे. तारामती शिखरावरून खाली कोकणकडा, एका बाजूस रोहिदास शिखर दिसते.
छायाचित्रे











